रमजानुल मुबारक - ७
*कोरोना आणि वजु*
इस्लाम धर्माच्या मूलतत्त्वांमध्ये नमाज हे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. दिवसातून दररोज पाच वेळा प्रत्येक मुस्लिम नागरिकांना नमाज पठण केले पाहिजे अशी शिकवण हजरत पैगंबरांनी दिलेली आहे.सकाळी फजर, दुपारी जोहर, सूर्यास्ता पूर्वी असर, सूर्यास्ताच्या वेळी मगरिब आणि रात्री ईशा. अश्या पाच वेळी नमाज दररोज पठण केली जाते. नमाजसाठी पूर्वतयारी म्हणून प्रत्येक वेळी तोंड हात पाय धुतले जातात त्याला वजू करणे असे म्हणतात. साडेचौदाशे वर्षांपूर्वी रुढ झालेली ही प्रथा आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किती योग्य आहे याची प्रचिती सध्या येत आहे. कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने वारंवार आपले तोंड, हात, नाक धुतले पाहिजे असे डॉक्टर वारंवार सांगत आहेत. कारण कोरोनाचे विषाणू हात ,नाक ,तोंडावाटे घशात जाण्याची शक्यता जास्त आहे.प्रत्येक नमाज पूर्वी याच पद्धतीने शरीराच्या या नाजूक व महत्त्वाच्या अवयवांची स्वच्छता केली जाते. यामध्ये तीनवेळा हात धुतले जातात, तीनवेळा तोंड धुतले जाते, तीनवेळा नाकात पाणी टाकून धुतले जाते, घोट्यापासून खाली पाय धुतले जातात. दिवसातून पाच वेळा अशी स्वच्छता केल्यानंतर शरीराच्या या सर्व भागावर कोणत्याही प्रकारचे विषाणू राहत नाही. म्हणजे कोरोना च्या निमित्ताने आज जे वैद्यकशास्त्र सांगत आहे तीच गोष्ट साडे चौदाशे वर्षांपूर्वी हजरत पैगंबरांनी सांगून ठेवलेली आहे.
कोरोनासारखे अनेक व्हायरस आपल्या अवतीभवतीअसतात. स्वच्छतेमुळे असे विषाणू नाश पावतात. म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येकाने स्वच्छता अंगीकारली पाहिजे. नुसतं आपलं शरीर नव्हे तर आपला परिसर, आपण राहतो तो परिसर, आपण काम करतो तो परिसर, जिथे आपण वावरतो तो सर्व परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याने विषाणूंचा प्रसार न होता विविधआजारापासून मुक्ती मिळते. मुळात सर्व प्रकारचे प्रदूषण वाढीस लावण्याचं काम मानवजातच करीत असते. गेल्या महिनाभराच्या लॉकडाऊन मुळे वातावरण, रस्ते, नद्या आणि निसर्ग खूपच स्वच्छ झाला आहे. गाड्या बंद असल्यामुळे हवेतील प्रदूषण बंद आहे. पर्यटन बंद असल्यामुळे नैसर्गिक वातावरणातही स्वच्छता आहे. माणूस घरात असल्याने बाहेरची घाण कमी झाली आहे. तात्पर्य म्हणजे प्रदूषण पसरवणारा घटक म्हणजे माणूस. हे समीकरण आता उघड झाले आहे.
वजू मुळे केवळ शरीर स्वच्छ राहत नाही तर आंतरिक मनात सुद्धा शुद्धतेची भावना निर्माण होऊन माणूस वाईट विचारांपासून अलिप्त राहतो. पाच वेळा नमाज पठण करणारी व्यक्ती कधीच वाईट मार्गाला जात नाही. म्हणून अल्लाहताला ने सदाचारा साठी नमाज निश्चित केली आणि नमाज पठण करण्यासाठी वजू अनिवार्य केले.प्रत्येक धर्माच्या ज्या चाली,रिती, परंपरा निर्माण झाल्या आहेत, त्यामागं अशी अनेक कारणे आहेत. कोरोनासारखे आजारापासून मुक्त राहण्यासाठी वजू करणे आवश्यक आहे.(क्रमशः )
*सलीमखान पठाण*
*9226408082*


No comments:
Post a Comment