Friday, May 1, 2020

रमजानुल मुबारक - ८ *कष्टात सवलत दयावी...*



                रमजानुल मुबारक - ८

              *कष्टात सवलत दयावी...*

पवित्र रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक स्त्री पुरुषाने रोजे धरणे अनिवार्य आहे . रोजे धरून आपले दैनंदिन कामकाज केले जाते . उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चौदा ते पंधरा तासांचा रोजा धरणे तसे कष्टप्रद काम आहे . परंतु अल्लाहवरील श्रद्धा हे कष्ट लिलया पेलण्यास भक्तांना प्रोत्साहित करीत असते . रोजे धरून समाजातील अनेक लोक आपले दैनंदिन कामकाज पार पाडतात .
 या महिन्यात मालकांनी आपल्या रोजे धरणाऱ्या नोकरांना कामात सवलत द्यावी, फार कष्ट करण्यापासून थोडी मदत करावी आणि त्यांच्यावर वाजवीपेक्षा कामाचे जास्त ओझे टाकू नयेअशी शिकवण हजरत पैगंबरांनी दिली आहे.जी व्यक्ती रोजे धरून आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी दिवसभर कष्ट करते व सायंकाळी घरी येऊन आपल्या कुटुंबाबरोबर रोजा सोडते, अशा कष्टकऱ्यांना बद्दल ईश्वराला खूप आनंद होतो. कष्टाच्या कमाईतून ज्यावेळी असा रोजेदार रोजा ईफ्तार करतो त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो.रमजान महिन्यामध्ये आपले नियमित कामकाज करून अल्लाहची मनोभावे प्रार्थना केली जाते. ती करताना प्रार्थनेचे सर्व संकेत पाळले जातात. अल्लाह तआला ने  कुरआनमध्ये म्हटले आहे कि रोजा मेरे लिये है और मै ही उसका  बदला दूंगा, म्हणजे रोजाचा मोबदला साक्षात अल्लाह देणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण अतिशय श्रद्धेने रमजानचे रोजे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो.

 काल जगभरामध्ये कामगार दिन म्हणजे मजदूर दिवस साजरा करण्यात आला. मजूर आहेत म्हणून मालकाला महत्त्व आहे. मजूर नसते तर या जगाची अवस्था काय झाली असती.हजरत पैगंबरांनी मजुरांबद्दल अत्यंत दयाळू भावना व्यक्त केली आहे. ज्यावेळी एखादा मजूर  कष्ट करतो, त्यावेळी त्याचे संपूर्ण अंग घामाने भिजलेले असते.ज्यावेळी तो त्याचे काम पूर्ण करतो, त्यावेळी त्याला मजुरीची अपेक्षा असते. प्रेषित हजरत पैगंबरांनी म्हटले आहे की, मजुरांची मजुरी त्याच्या अंगावरील घाम सुकण्यापूर्वी आदा करा .इस्लामने कष्टकऱ्यांचा नेहमी आदर केला आहे. हजरत अबूबकर सिद्दिक ज्या वेळी खलिफा ( बादशाह )झाले.त्यावेळी त्यांना विचारलं गेलं की तुमची मजुरी (मानधन ) काय ?  ते म्हणाले की जे एका मजुराला दिले जाते तेच.त्या मजुरीत तुमचे भागेल का ?असा प्रश्न जेव्हा त्यांना केला गेला, तेव्हा त्यांनी उत्तर दिले कि जर नाही भागले तर मी आधी मजुरांच्या मजुरीत वाढ करील आणि नंतर माझे मानधन वाढविन .
आज आपण पाहतो की राज्यकर्ते धडाधड आपल्या फायद्याच्या सवलती सत्तेच्या जोरावर मंजूर करून घेतात . लोकप्रतिनिधींना लोकांची नाही तर स्वतःची जास्त काळजी वाटते . सत्तेचा फायदा स्वतःसाठी किती आणि कसा करून घेता येईल याकडेच सर्वांचा कल असतो . परंतु इस्लाम धर्माला हे मान्य नाही . लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. त्याने जनतेची सेवा करायची असते. जनतेच्या सोयी-सवलती पाहायच्या असतात. ही शिकवण हजरत पैगंबरांनी दिली आहे.
दुसरे खलिफा हजरत उमर फारूक म्हणायचे कि दजला नदीच्या काठी जर एखादा कुत्रा भुकेने मरून पडला तर त्याची जबाबदारी उमर वर राहील . एवढी काळजी त्याकाळात घेतली जात होती . आजचे लोकप्रतिनिधी स्वतःचे कर्तव्य विसरले आहेत . परमार्था ऐवजी स्वार्थाला प्राधान्य दिले जात आहे . त्यामुळे ईश्वर, अल्लाह नाराज झाला असून कोरूना सारख्या आजाराच्या रूपाने तो आता आपल्या मागे लागला आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.गोरगरीब, कष्टकरी, लाचार, मजबूर अशा घटकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. ( क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*9226408082*

No comments:

Post a Comment